दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित लेख आपल्या सर्व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ति यांच्यासाठी...
महाविद्यालयाची पायरी न चढताही केवळ परीक्षा देवून विद्यार्थ्यांना यशस्वी करणारी शिक्षणपद्धत आता कालबाह्य झाली असून नव्या युगाची क्रेडिट सिस्टिम शिक्षण क्षेत्रात लोकप्रिय ठरू लागली आहे. क्रेडिट सिस्टिमची ही आधुनिक पद्धत आता राज्यातही लागू झाली असून या पद्धतीमुळे नव्या वर्षांत शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांमध्ये क्रेडिट सिस्टिम लागू करण्याची घोषणा राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रेडिट सिस्टिमची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल.
क्रेडिट सिस्टिम म्हणजे नक्की काय, हा प्रश्न अद्यापही सव सामान्यांना सतावतो आहे. लॉर्ड मेकॉलेने रूजविलेली ब्रिटीशकालीन शिक्षणपद्धत ही केवळ कारकून निर्माण करण्यासाठीच पोषक होती. विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याच्या दृष्टीने ही जुनाट पद्धत ‘आऊटडेटेड’ झाली आहे. क्रमिक पुस्तकांची घोकंपट्टी करून थेट परीक्षा दिली की झाले, हा विचार आता मागे पडतो आहे.
सत्रनिहाय अभ्यासक्रम पद्धत, विषयनिहाय लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची प्रत्येकी पन्नास टक्के गुणांची परीक्षा, गुणपत्रिकेत टक्केवारींऐवजी श्रेणी पद्धत हे ‘क्रेडिट सिस्टिम’चे खास वैशिष्टय़ आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात नियमित बसावे लागणार आहे. शिवाय, शिक्षकांनाही वर्गात नियमितपणे येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
वर्गात जो भाग शिकविला आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रकल्प दिले जातील किंवा तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या आधारे विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळणार आहेत. प्रकल्प कार्य व तोंडी परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहून चालणार नाही. किंबहुना ७५ टक्के कमी हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाही बसता येणार नाही. या नव्या पद्धतीमुळे एखाद्या घटकाचे विविध कंगोरे अभ्यासण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. त्यांच्या आकलनशक्तीचा विकास होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे, संशोधन क्षेत्राकडे, पीएचडी करण्याकडे त्यांचा कल वाढेल.
या नव्या पद्धतीबद्दल विद्यार्थी , शिक्षक व शिक्षणसंस्था यांच्यातच काहीशी गोंधळलेली स्थिती आहे. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी या नव्या पद्धतीबाबत जनजागृती करायला हवी. त्याचे फायदे-तोटे सर्वांच्याच लक्षात आणून द्यायला हवेत. एवढेच नव्हे तर, क्रेडिट सिस्टिमच्या अनुषंगाने वर्गातील मर्यादित विद्याथी संख्या, अभ्यासक्रमाची जुनाट रचना, आधुनिक तंत्रज्ञान आदींचा नव्याने विचार करायला हवा. या नव्या पद्धतीची नव्या वर्षांत किती ठोसपणे अंमलबजावणी होतेय, याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
No comments:
Post a Comment